Friday, September 22, 2017

आपुल्या विचार करीन जीवा‌शी - संत तुकाराम


आपुल्या विचार करीन जीवा‌शी । काय या जनाशी चा‌ड मज ॥
आपुले स्वहित जाण‌ती सकळे । निरोधिता बळे दु:ख वाटे ॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनिया घरी निजो सुखे ॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनिया वाट आणिका लावू ॥
तुका म्हणे भाकू आपुली करुणा । जयाची वासना तया फळे ॥


साधक अवस्थेत असताना आपण स्वहिताचा विचार करावा असं संत तुकाराम येथे सांगतात. बाकी लोक अापल्या सांगण्याने बदलत नसतील, तर त्याचे दु:ख मानू नये, स्वत:ला त्रास करून घेऊ नये. अापण अापल्या परीने प्रयत्न करून बाकीच्यांना भक्तीचा पंथ दाखवण्याचा प्रयत्न करावा अाणि त्यांनी ऐकले तरी ठीक नाही ऐकले तरी ठीक या नियमाने वागावे.

तुकाराम महाराज म्हणतात,
मी आता स्वत:च्या जीवाचा विचार करीन, जनांचा जास्त विचार करणार नाही.
सगळे लोक आपले स्वहित जाणून आहेत, त्यांना जर आपण काही सांगितले किंवा काही वाईट सवयी सुधारण्यासाठी सांगितले (निरोध करण्याचा प्रयत्न केला), तर त्याचे लोकांना दु:ख होते.
त्यामुळे मी माझ्या परीने भगवंताची कथा-कीर्तन करीन, ते कोणी ऐको वा न ऐको, मी वाईट वाटून घेणार नाही. घरी जाऊन सुखाने, निश्चिंतीने झोपी जाईल (त्यासाठी स्वत:ची झोप उडवून घेणार नाही).
मला कुठे एवढे पडले आहे की ही भक्तीची जी वाट मला सापडली आहे, बाकी जनांना ही त्या वाटेला लावू.
आता पांडुरंगाला माझीच करुणा भाकावी, बाकी ज्याची जशी भावना/विचार आहे, त्याप्रमाणे पांडुरंग त्यांना फळ देईलच!

In short, do not worry about results of your preaching to others. Instead, be focused on improving yourself, all the rest will be taken care by Lord himself.

Saturday, April 22, 2017

शेवटचा दिस गोड व्हावा - संत तुकाराम

याजसाटी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||
आता निश्चिंतीने पावलो विसावा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||
कवतुक वाटे जालिया वेचाचे | नाव मंगळाचे तेणे गुणे ||
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी | आता दिवस चारी खेळीमेळी ||

संत ज्ञानेश्वर महाराज जो 'सोनियाचा दिनु' म्हणतात तो तुकारामांच्या जीवनात आला त्या वेळचा हा अभंग. त्यांनी सगळे कष्ट, त्याग, अभ्यास ज्या साठी केले ते त्यांना प्राप्त झाले असा हा मंगल क्षण. अत्यंत कठोर मेहनत घेतल्यानंतर जेव्हा कष्टाचे चीज होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मौल्यवान असते. तुकाराम महाराजांनी भागवत्प्राप्ती साठी सगळे कष्ट घेतले होते, ते फलद्रुप झाल्याचा हा क्षण. 

ते म्हणतात त्यांनी जो सर्व अट्टाहास केला तो यासाठी होता कि आयुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्याच्या अंती समाधान असावे. अपूर्ण इच्छा, मृत्यूचे भय इ. काही नसावे. ते म्हणतात कि आता मला विसावा मिळाला आहे. आता मी निश्चिन्त आहे कारण आता कुठलीही तृष्णा त्यांच्या मनात शेष नाही, समाधान आहे. मनात कुठलीही तृष्णा नसणे, समाधान आणि आनंद असणे हेच भगवत्प्राप्तीचे लक्षण आहे. 
ते पुढे म्हणतात कि आतापर्यंत जे कष्ट घेतले त्याचे आता कौतुक वाटते आहे. म्हणजेच मेहनत घेताना जो त्रास सहन केला तो आता त्रास न वाटता गोडच वाटतो आहे. कारण त्या कष्टांमुळेच आजचा मंगल दिवस पाहायला मिळाला आहे. ते पुढे म्हणतात कि आता मुक्ती हिच आता त्यांची नवरी होणार आहे, म्हणजेच हे जग सोडल्यानंतर त्यांना मोक्ष प्राप्त होणार आहे. आणि तो पर्यंत खेळी मेळित उरलेले आयुष्य काढायचे आहे. 

या आणि यासारख्या तुकारामांच्या अभंगातून आपल्यासारख्या साधारण जनांना प्रेरणा मिळते. आपण जर जीवापाड मेहनत घेतली तर भागवत्प्राप्ती ही दूर नाही हेच कळते. आपणही सगळ्यांनी अट्टाहास करावा आणि शेवटचा दिवस गोड व्हावा हीच प्रार्थना!

Friday, January 13, 2017

मनाचे श्लोक - ७६

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही।
नव्हे भोग ना त्याग ना सा़ंग पाही॥
म्हणे दास, विश्वास, नामी धरावा।

प्रभाते मनी राम चि‌ंतीत जावा॥

मनाचे श्लोक म्हणजे मराठी भाषेतली एक खूप मोलाची रचना आहे. संत रामदासांनी मनाला शिकवण देण्यासाठी मनाचे श्लोक लिहीले आहेत. मनाला गोडी गुलाबीने (मना सज्जना.., मना प्रार्थना तुला.., .) सुधारण्याचा आणि दुर्गुणांचा त्याग करून सद्गुण अंगी बाणण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे.

वरील श्लोकात, संत रामदास अत्यंत साध्या-सरळ भाषेत भगवंताच्या नामाचे महत्व सांगत आहेत. ते म्हणतात, मना तुला कर्म, धर्म, योग यांची चिंता करण्याची गरज नाही. भोग-त्याग, सांग (विधी-निषेध) यांचा ही विचार करू नकोस. फक्त भगवंताच्या नामावर विश्वास ठेवून नित्य नामस्मरण करत जा. रोज सकाळी रामाचे चिंतन करत जा. हे केल्यावर तुला भगवत्प्राप्तीसाठी बाकी कुठल्याच साधनाची गरज नाही!