Saturday, December 3, 2022

मन दृढ करा - संत तुकाराम

आयुष्यात कुठलेही मोठे किंवा महत्वाचे कार्य करायचे असेल तर त्याला कष्ट, त्याग आणि कठीण परिस्थितीत धैर्य हे आवश्यक असतात. एक इंग्रजीत ही म्हण आहेच

“Nothing worth having comes easy.” -Theodore Roosevelt

हे जर संसारातल्या वस्तूंसाठी आपण म्हणतो, तर भगवंताच्या प्राप्तीसाठी तर त्याहून खरे आहे. एका ठिकाणी संत तुकारामांनी म्हणलेच आहे 

भक्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥


पुढील अभंगातही तुकाराम महाराज आपल्याला असंच सांगत आहेत. ते म्हणतात,


साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहे ।।१।।

तया रीती दृढ मन । करी साधाया कारण ।।धृ ।।

बाण शस्त्र साहे गोळी । शूरा ठाव उंच स्थळी ।।२।।

तुका म्हणे सती । अग्न न देखे ज्या रीती ।।३।।


आपल्या सर्वांनाच हा अनुभव आहे, आपण एखादा काहीतरी चांगले करण्याचा संकल्प करतो (जसे की व्यायाम, नामजप इ.), ते थोडे दिवस करतो ही, पण थोड्याच दिवसात कोणत्या ना कोणत्या कारणाने थांबते. इथे आपल्या मनाचा कमकुवतपणाच कारणीभूत असतो. तुकाराम महाराज हे ओळखतात म्हणूनच आपल्याला हा उपदेश करत आहेत.

पाषाणाला जसे टांकीचे घाव सहन केल्याशिवाय देवपण येत नाही, तसेच आपल्यालाही मन कठीण करून येणाऱ्या अडचणींना सामोरे गेल्याशिवाय यश मिळणार नाहीच. त्यामुळे कुठलेही साध्य साधण्यासाठी आपले मन दृढ ठेवून प्रयत्न करत राहिले पाहिजे.

ते शूरांचे आणि सतीचे उदाहरण देतात. ज्याप्रमाणे शूर सैनिक बाण, शस्त्र आणि गोळ्या यांना सहन करत, निडरपणे लढतो आणि त्यानंतरच त्याला उच्च स्थान प्राप्त होते. तसेच पूर्वीच्या काळी सती जाणाऱ्या स्त्रीला खूप मान असे, त्यासाठी अग्नी समोर असूनही मन दृढ करून उडी मारावी लागत असे.

त्याचप्रमाणे ते साधकांना म्हणत आहेत (जे सर्वानाच लागू होते), भक्ती करण्यासाठी पण आपण कुठलाही नियम घेताना तो मन दृढ करून घ्यावा, एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली कि मग संकट किंवा अडचणी येता मागे वळून पाहू नये. देवाला प्रार्थना करून संकटांना तोंड द्यावे, आणि तो पांडुरंग (ज्याला आपण दयासागर ही म्हणतो), आपल्याला त्यातून बाहेर पडण्याची मदत नक्कीच करेल!